बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

रतनगड ट्रैक स्टोरी भाग 2 -टाइगर ट्रैकर्स

प्रत्येकाचे चेहरे बघन्यासारखे झाले होते.त्यांच्यात स्फूर्ती आणण्याची गरज होती. आमच्याजवळील माइक सिस्टीम बाहेर काढली आणि शिवछत्रपतींच्या आणि आई भवानीच्या जयघोषाने अवघे जंगल दुमदुमुन गेले.फक्त 6 जणांचा आवाज पण ऐकणाऱ्याला वाटाव कि 50000 हजाराची फौज गडावर चाल करुन येत आहे.मित्रांमध्ये स्फूर्ती आली आणि पुन्हा नव्या दम्याने आणि जोशाने रतनगड जवळ करू लागलो.बरोबर तीन तासाने आमच पहिल टार्गेट पहिली शिडी गाठली.रतनगडच्या या शिड्या उभ्या कड्याला भिडलेल्या आहेत.आणि काळाने खुप गंजलेल्या अवस्थेत आहेत.नजर वर करुन पहिल तरी दरदरून घाम सुटावा.एकावेळी एकच माणूस शिडीवरुन जाऊ शकतो.या शिडीवरुन तोल गेलाच तर मृत्युला खुल आमंत्रण दिल्यासारखे आहे.शिवछत्रपतींचा जयघोष आसमंतात दुमदुमत होता.या शिड्या अंदाजे 4000 किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत.वरुन खाली बघितल आणि आम्हाला कल्पना आली कि आम्ही किती मोठ शिखर सर केले आहे.अशा 6 आडव्या -उभ्या शिड्या पार केल्यावर दरवाजा लागतो.दरवाजा आजही उत्तम स्तिथीमध्ये आहे.दरवाज्यावरील शिल्पकामही अप्रतिम आहे.दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला एक प्रचंड कडा लागतो. जायला एक निमुळती वाट आहे आता शासनाने तेथे तटबंदी उभारली आहे.ईथे दोन गुहा आहेत 1) रत्नादेवीची गुहा 2)अंधारी गुहा रत्नादेवीच्या गुहेमध्ये 6 जणांचा ग्रुप आरामात राहु शकतो.तर मोठ्या गुहेमध्ये 20 ते 25 जण आरामात राहु शकतात.रत्नादेवीची गुहा ही आतून अतिशय उबदार ,स्वच्छ प्रकाशाची आणि सुरक्षित आहे.सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला रत्नादेवीची गुहा रहायला मिळाली.गुहेमध्ये रत्नादेवीची अतिशय प्राचीन मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा प्राचीन मूर्ती आहे.रत्नादेवीची आम्ही सर्वानी विधिवत पूजा केली.आता आपल्याला कळले असेल की रत्नादेवीच्या नावावरूनच गडाला रतनगड असे नाव पडले. गडावर पोहोचल्यावर आम्ही एनर्जीसाठी लिंबु सरबताचा बेत आखला होता पण रतनवाडीला लिंबु मिळालच नाही साखर तेवढी बरोबर होती.साखरेचे गोड पाणी आम्ही प्यायलो.पण ते गोड पाणी प्रचंड थंडगार आणि मधुर लागत होत.गडावर थंडगार पाण्याची दोन तळी आहेत आणि त्यामध्ये मुबलक पाणी बारमाही असते.त्याबरोबरच भेळ बनवली होती.थोडस पोटात गेल्यामुळे बर वाटत होते.विश्रांती केल्यानंतर आम्ही गड फिरण्यासाठी बाहेर पडलो.फोटोग्राफी साठी जनुकाही रतनगडावरील आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच शिखरे आम्हाला साद घालत होती.रत्नादेवीच्या गुहेच्या समोर डाव्या हाताला आकाशाला भिडलेला एक प्रचंड सुळका दिसतो तेथील गावकरी यांच्या मते त्या सुळक्यावर शिवपिंडी आहे व तिथून सतत पाण्याची धार चालु असते.कावेरी नदीच उगमस्थान तेथे आहे याबद्दल गावकर्यांच्या मनात संभ्रम आहे. रतनगडावरील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे.आयुष्यात इतकी शांतता प्रथमच अनुभवत होतो.मन अगदी निरभ्र होऊन गेले होते.तेव्हाच मनाशी ठरवले की आयुष्यात पुन्हा कधीतरी नक्कीच या ठिकाणी येईन.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

रतनगड ट्रैक स्टोरी -टाइगर ट्रैकर्स

22 nov 2013 हा दिवस माझ्या आयुष्यातला एक यादगार दिवस म्हणता येईल .रतनगड ट्रैकच्या निमित्ताने एक अतिशय दुर्गम असा ट्रैक आम्ही पार पाडला .टाइगर ट्रेकर्सचे ग्रुप लीडर वैभव भालेकर आणि इतर सभासद त्यामध्ये संतोष भाताडे,सचिन भातरे ,नितेश पांचाळ ,चेतन टेंकाळे आणि मी. अवघे 6 जण .परंतु दुर्दैम्य इच्छाशक्ती ,धाडस 'आणि चिकाटी या जोरावरती हा ट्रैक पार करणाऱ्या या माझ्या मित्रांना सलाम करतो. आणि या ट्रेकच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचा हा छोटासा प्रयत्न ........ अंधेरीमध्ये (सीप्ज) साई संघवी स्टार प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे.आता ती बंद आहे पण आजही साईबाबांच मंदिर तेथे आहे.या कंपनीमध्ये आम्ही त्यावेळी कामावर होतो.ग्रुपमधील सर्वजण कोकणाकडचे असल्याने आमची एकमेकांशी छान मैत्री झाली होती.आणि अशातच आमचं पिकनिकनला जायचे ठरले.रतनगडला भाऊ वैभव जावून आलेला असल्यामुळे त्याला तिकडची सर्व माहिती होती.तोही आमच्याबरोबर कामाला होता.त्यामुळे बेसिक प्लानपासून अगदी फाइनल प्लॅनिंग सर्व त्याने केल होत.म्हणजेच गाडीच वेळापत्रक ,मॅप,कालावधी वैगरे सर्वकाही..... अगदी मिनिटांचा हिशोब काढला होता.अर्थात त्याला बेस्ट प्लानरचा किताब दिला पाहिजे असा मानुस. 22 nov 2013 तारीखला शुक्रवारी संध्याकाळी आम्ही सर्वजण c.s.t स्टेशनला एकत्र जमलो.कारण आम्हाला रात्रीची महानगरी एक्सप्रेस पकडायची होती.या एक्सप्रेसला दोनच जनरल डबे असतात.आम्हाला मस्तपैकी बसायला जागा मिळाली आणि अशारीतिने आमच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.इगतपुरी स्टेशनला आम्हाला उतरायच होत.ईगतपुरीहुन आम्हाला शेंडी गावाला जाणारी बस पकडायची होती.इगतपुरी बसस्टैंडलाच आम्ही रात्र काढली आणि सकाळी 6.30 पहिली बस पकडून शेंडीला निघालो.अफाट थंडी पडली होती.बसचा मार्ग अतिशय खडतर होता आणि रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते.बरोबर 7 वाजता आम्ही शेंडी गावच्या फाटयावर उतरलो.कारण तिथून आम्हाला रतनवाडी गडाचा पायथा जवळ करायचा होता.रतनवाडीतून रतनगडला जायचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे भंडारदरा डॅम 9 किमी होडिने किंवा रस्त्याने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे शेंडी गावात उतरल्यावर पाच मिनिटे सरळ पुढे चालत गेल्यावर भंडारदरा डॅम हे इंग्रजकालीन मोठे धरण आहे.या भागाला पिकनिक पॉइंट असे म्हणतात .ईथे आम्ही फोटोग्राफीची हौस भागवुन घेतली.बोट फेरींची सोय नसल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्स गाडी बुक केली.दोन वेळेच्या येन्याजाण्यासाठी गाडी असणार होती.आणि अशारीतिने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे आम्ही निघालो अतिशय खाचखळग्याचा रस्ता आहे.प्रवासामध्ये रंगत भरण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर आणलेली ढोलकी काढली आणि आमच्या भजनाला सुरुवात झाली.माझा भाऊ वैभव हा उत्कृष्ट ढोलकीपटु असल्यामुळे कार्यक्रममध्ये अतिशय रंगत आली. 1.30 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रतनवाडीला पोचलो.इथेच अमृतेश्वर देवस्थान आहे.अतिशय पुरातन असे मंदिर आहे अंदाजे 700-800 वर्ष पुरातन असावे.आम्ही मंदिरात पोचलो त्यावेळी मंदिराच्या गाभार्यामध्ये पाणी होते.शिवपिंडी पूर्ण पाण्यात होती. दरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणातील नंदी आपल स्वागत करतो.अमृतेश्वर मंदिराजवळील प्राचीन तळे अतिशय मनोहर आहे.अमृतेश्वर देवाची पूजा करुन आम्ही मोहिमेला सुरुवात केली. आमचे सुदैव असे कि गावातील काही मंडळी गडावर पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी चालली होती त्यामुळे आम्हाला वाटाड्याची गरजच उरली नाही.सरळ रस्ता संपून जंगल चालू झाले होते.सह्याद्रीचच जंगल ते निबिड घनदाट .हिंस्त्र श्वापदांची तेथे काहीच कमी न्हवती.जंगलामध्ये खुप फसव्या वाटा आहेत त्यामुळे पुरेशी माहिती असल्यशिवाय जाने धोक्याचे आहे.पर्याच्या काठाकाठाने वाट जाते.आणि येथील निसर्गसौंदर्य तर अवर्णनीय सोबतच्या मंडळीला गडावर जाण्यासाठी घाई असल्यामुळे त्यांच्याकडून वाटेची पुरेशी माहिती घेतली.चालता चालता सूर्य डोक्यावर कधी आला ते कळलेच नाही .उभ्या चढनीमुळे सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहु लागल्या होत्या.वाटेच्या जवळच मोठा पर्या वाहत होता आणि आमची अंघोळही झाली न्हवती.मग काय एक छानशी जागा अंघोळीसाठी निवडली. पाण्यात पाय घातला आणि काय अंगावर काटा आला .बर्फापेक्षा थंडगार पाणी आणि तेही भरदुपारी 12 वाजता आयुष्यात पहिल्यांदा पाहत असेन.पाण्यामध्ये यथेच्छ अंघोळीवर ताव मारला .आणि आम्ही मार्गक्रमित झालो.सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात .1)वारा2)वाघ3)मराठे.... या वाक्याची जर प्रचिती घ्यावयाची असेल ना तर ईथे यावे.रतनगडचे प्रस्तररोहण उभ्या चढनीचे आहे.दर एक तासाने विश्रांती घ्यावी लागत होती.बरोबर आणलेल्या काकडी ,गाजर यांचा एव्हाना फन्ना पडला होता.अगदी पेपरमिटची एक गोळीसुद्धा वाचली नाही.एक डोंगर संपला की आता गड येईल अशी आशा वाटत होती पण गड काही नजरेत येत न्हवता.माझे सर्व मित्र काकुळतिला आले होते.