बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

भटकंती 1


पाऊस सुरु झाला की लगेचच मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत या पावसाळ्यात कुठे कुठे जायचे याचे आराखडे बांधाले जातात आणि वेगवेगळ्या स्थळांची माहिती गोळा करण्याची लगबग सुरु होते. परंतु तीच तीच ठिकाणं आणि तिकडची गर्दी आठवली की बर्‍याच जणांचा हिरमोड होतो. म्हणून प्रत्येकाला थोडसं ऑफबीट, वेगळ्या ठिकाणी जायला नक्की आवडेल. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश नितांत सुंदर आहे. महाराष्ट्राला सुंदर सागरी किनारा, अनेक नद्या तसेच सह्याद्री-सातपुडासारख्या डोंगररांगा, जंगल, अभयारण्ये, मंदिरे, गडकिल्ले, इत्यादी ब-याच गोष्टी लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासदेखील लाभला आहे. मुंबई ते चंद्रपूर आणि सावंतवाडी ते तोरणमाळ या संपूर्ण प्रदेशात पावसाळ्यात जाण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. पुण्याजवळच असलेली ज्ञानदेवांची आळंदी, तुकोबारायांचा भंडारा डोंगर, देहू, संभाजी महाराजांचे स्मारक असलेले आणि नदी संगमावर वसलेले तुळापूर, तसेच राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, सोनोरी, इत्यादीसारखे बरेच किल्ले आहेत. त्याचप्रमाणे लोणावळ्याचे भुशी धरण, त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी बरीच लोक जातात पण तेथून जवळच असलेला कोरीगड, तैल बैला, घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला – भाजे लेण्या, लोहगड , विसापूर, राजमाची, तुंग, तिकोना यासारखे किल्लेदेखील एका दिवसात भेट देण्याजोगी ठिकाण आहेत. तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो आणि हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल द-याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो. याच रस्त्यावर विंझणे गावात विंझाई देवीचे सुंदर मंदिर आहे आणि त्या मागे एक अतिशय चांगले जंगल आहे. हे जंगल निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवनच आहे. येथे विविध प्रकारचे साप, बेडूक, पशु-पक्षी, फुल पाखरे, वनस्पती इत्यादीचा अभ्यास करता येईल. माळशेज घाटाचे सौंदर्य बर्‍याचजणांनी अनुभवले असेल पण त्याचबरोबर माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो. मुरबाड माळशेज रस्त्यावर वैशाखरेहून पावसाळ्यात ट्रेक करण म्हणजे एक वेगळच थ्रिल आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार – म्हणजे गरिबांचे महाबळेेशर असा ज्याचा उल्लेख केला जातो असे एक वेगळे आणि डोंगर- द-या, असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन असून पावसाळ्यात हे अतिशय सुंदर दिसते. तेथील राजवाडा, हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा इत्यादी ठिकाण पाहण्यासारखी असून, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी – कातकरी लोकांचे राहणीमान बघण्याचे जव्हार हे उत्तम ठिकाण आहे. जव्हारहून कसार्‍याला जाणार्‍या रस्त्यावर देवबांध या गावी नदी किनारी गणपतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि याच रस्त्याने पुढे गेल्यावर कसार्‍या घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्ला देखील पाहण्यासारखा आहे. जव्हारहून मोखाडमार्गे त्र्यंबकेश्‍वर येथे जाता येते. त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेऊन ब्रम्हगिरी पर्वतावर जाताना वाटेत अनेक धबधबे आपले मन मोहून टाकतात. येथे ब्रम्हगिरी पर्वताची परिक्रमा देखील करता येते. ही परिक्रमा करताना छोटे मोठे ओढे, उंच डोंगरावरून पडणारे धबधबे इत्यादी बघताना परिक्रमा कधी पूर्ण होते हे कळतच नाही. त्याच प्रमाणे नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या ब-याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. ठाणे जिल्ह्यातील वाडा या गजबजलेल्या गावापासून एक रस्ता जंगलातून नदी किना-याहून वासिंदला जातो. माहुली किल्ल्याच्या मागे असणा- या या रस्त्याने पावसाळ्यात जाणे म्हणजे धमालच आहे. त्याचप्रमाणे ठाणे – नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा अभयारण्याकडे जाणारा रस्ता आहे आणि याच महामार्गाजवळ भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे, इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाण्यासाठी काहीच हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणारे कळसुबाई आणि तेथून जवळच असणारा भंडारदरा, रंध धबधबा येथे पावसाळ्यात भेट देणे म्हणजे ऐशच. भंडारद-या जवळ असणारे अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे येथील साम्रात गावाजवळील सांधण दरी आपले पैसे वसूल करते. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक ट्रेकर्स मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रैक देखील करतात. साभार :गूगल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा